माणगांव : रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे कोरोना काळात रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील जनतेला वरदानच ठरले होते. शासनाकडून तसेच अनेक संस्थानी मदतीचा हात पुढे करून उपयुक्त अशा अद्यावत मशनरी उपजिल्ह्या रुग्णालयाला देत सहकार्याची भावना बजावली आहे. अद्यावत मशनरी असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे अपुरे मनुष्यबळ व तज्ञांची कमतरता नेहमीच भासत असते. अशाच जिते आदिवासीवाडी येथील सुमन मोतीराम हिलम, वय ४२ वर्ष आदिवासी महिलेवर अवघड यशस्वी शस्त्रक्रिया करीत गर्भाशयासहित अडीच किलोचा ट्युमर (tumor) काढण्यात आले.
माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील जिते आदिवासीवाडी येथील सुमन हिलम ही महिला गेली सहा महिने पोटाच्या त्रासामुळे उपजिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखाने येथे पोट त्रासाने त्रस्त होऊन फेऱ्या मारत होती. गेली वर्षभर सतत पोटदुखी व अति रक्तस्त्राव त्रास तिला होत होता. जिते माजी सरपंच कोंडू फाळके यांनी सदरील रुग्णाची माहिती काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आंतर्गत उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कार्यरत असलेल्या डॉ. संतोष कामेरकर यांना दिली यावेळी सदरील रुग्णाला बोलावून तिची तपासणी करण्यात आली. यात तिच्या गर्भाशयात ट्युमर असल्याचे निदर्शनास आले. शरीरात रक्ताचे प्रमाण देखील कमी असल्याचे तपासणीवरून दिसले. तिची हिमोग्लोबीन लेवल ५ ग्राम होती.
ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याने या महिलेला अनेकांनी मुंबई येथे जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु, या आदिवासी रुग्णाच्या नातेवाईकांनी आमची परिस्थिती नाही. आम्हाला मुंबईतील काही माहीत नाही. आम्ही मुंबईला जाणार नाही. आम्ही आमच्या रुग्णाला घरी घेऊन जातो असे म्हणत रुग्णाला घरी नेण्यास तयार झाले. यावेळी ही जोखीम पत्करत उपजिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ. संतोष कामेरकर व भुलतज्ञ डॉ. सावंत यांनी या रुग्णाची परिस्थिती व आजाराने ग्रासलेला याची दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी ही जोखीम पत्करत रुग्णाच्या नातेवाईकांना याची पूर्व कल्पना देऊन रुग्णाच्या नातेवाईकांकडून संमती घेऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने ५ बॉटल रक्त चढविण्यात आले. तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भाशयासहित अडीच किलोचा ट्युमर काढण्यात आला. व ही अवघड यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
ही शस्त्रक्रिया सर्जन डॉ. संतोष कामेरकर, भुलतज्ञ डॉ. सावंत उपस्थित शस्त्रक्रिया गृहातील कर्मचारी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. ७ दिवसांनी महिला रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. आता रूग्ण ठणठणीत बरा झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रुग्ण महिलेचे नातेवाईक यांच्या चेहऱ्यावरचा समाधान पाहून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड व जोखमीची असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडल्याने माणगांव तालुक्यातून सर्वांचे कौतुक होत आहे.