नाम हे परमात्मास्वरूपच

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे, तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की, भगवंत मुळात जो निर्गुण, निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नाम-रूप लागले; आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे, आणि वृत्तिसुद्धा सूक्ष्म आहे; म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे.


अन्नाला स्वत:ची चव असते; त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत; परंतु सर्वांना शेवटी ‘बारीतून’ जाऊनच दर्शन घ्यावे लागते; त्याप्रमाणे, इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे, आणि ते घेता घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे, हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे.


जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे, तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते; परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते, आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे, की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.


तात्पर्य : नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,