नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १६ व १७ डिसेंबरला राज्यसभेत भारतीय संविधानावर चर्चा होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी काँग्रेसने राज्यसभा (Rajya Sabha) सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच शुक्रवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर १६ डिसेंबरपर्यंत राज्यसभा सभागृह तहकूब करण्यात आले आहे.
राज्यसभा सभापती सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवत नाहीत. विरोधी पक्षांना पुरेसा वेळ दिला जात नाही, असा आरोप विरोधी पक्षाने अविश्वास ठराव मांडताना केला आहे. यावर सभापतींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विरोधकांच्या अविश्वास ठरावावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मरेन पण झुकणार नाही. तुम्ही लोकांनी संविधानाचे तुकडे केलेत. मी खूप सहन केले. तुम्हाला प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे; पण तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात, अशा शब्दांमध्ये सभापतींनी त्यांचे मत व्यक्त केले.
Economy : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री
काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा एकदा राज्यसभा सभापतींवर पक्षपाताचा आरोप केला.ते म्हणाले, तुम्ही भाजप खासदारांना बोलण्याची संधी देत आहात, तर काँग्रेसला नाही. आम्ही तुमची स्तुती ऐकायला इथे आलो नाही तर जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आलो आहोत.
संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज २५ नोव्हेंबरपासून सुरू आहे. दरम्यान अदानी भष्टाचार प्रकरण, संभल, मणिपूर हिंसाचार यांसारखे मुद्दे अधिवेशनादरम्यान गाजले. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभापतींविरोधातील आरोप खोडत काँग्रेसचे हे सभागृहातील वर्तन नियमांविरोधात आहे, असे प्रत्त्युत्तर दिले. दरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ झाला, यानंतर सभागृहाचे कामकाज सोमवार १६ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.