मुंबई: पर्थमधील विजयी सुरुवातीनंतर टीम इंडिया अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करण्यात अपयशी ठरली. ॲडलेडमधील डे-नाईट कसोटीत तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखत टीम इंडियाचा पराभव केला.टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी घोर निराशा केली आहे. विराटने या सामन्यातील पराभवाच्या आणि धावांच्या अपयशानंतर मोठा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयाचं लिटील मास्टर सुनील गावसकर यांनीही कौतुक केलं आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा सामना हा १४ ते १८ डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन, गाबा येथे होणार आहे. विराट दुसऱ्या कसोटीतील पराभवांनतर वेळ न दवडता तिसऱ्या सामन्याच्या अनुषंगाने नेट्समध्ये जाऊन बॅटिंगचा सराव करु लागला. विराटच्या या निर्णयाचं गावसकर यांनी कौतुक केलं आहे.
“विराटने नेट्समध्ये जाऊन त्याचं समर्पण दाखवून दिलं. मात्र मला इतर खेळाडूंकडूनही विराटसारखीच अपेक्षा आहे. विराटने धावा केल्या नाहीत. विराटने देशासाठी जे काही केलंय, त्यासाठी त्याला फार गर्व आहे. विराटने या सामन्यात धावा केल्या नाहीत, त्यामुळे तो नेट्समध्ये आहे. तो कठोर मेहनत करतो, घाम गाळतोय आणि हेच पाहणं अपेक्षित आहे. कठोर मेहनतीनंतरही तुम्ही आऊट झालात, तर काही हरकत नाही, कारण हा खेळ आहे. तुम्ही एक दिवस धावा कराल, एक दिवस विकेट घ्याल, दुसऱ्या दिवशी नाही. मात्र तुम्हाला प्रयत्न करत रहावे लागतील. विराट मेहनत करतोय, तो मेहनत करतोय. त्यामुळे विराटने जरी पुढील सामन्यात धावा केल्या नाहीत, तरी मला आश्चर्य वाटणार नाही”, असं गावसकर यांनी म्हटलं.