Thursday, March 26, 2026

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता.मात्र दुसऱ्या कसोटीत गिलच्या संघाने दाखवून दिलं की हम भी कुछ कम नही...एजबेस्टनमध्ये गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं ऐतिहासिक असा विजय मिळवलाय. भारताचा स्टार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत तब्बल ३३६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडला जिंकण्यासाठी ६०८ धावा हव्या होत्या. मात्र इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ २७१ धावा करता आल्या. या ऐतिहासिक विजयासह भारतानं या मालिकेत १-१ अशी बरोबरी गाठलीये. खरंतर या सामन्यात गिलची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. या एकट्या पठ्ठ्यानं संपूर्ण कसोटीत चारशेपेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या डावात त्याने अडीचशेहून अधिक धावा केल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या डावातही तो चमकला. दुसऱ्या डावात त्याने १६१ धावा केल्या. त्यामुळे भारताची जी एकूण धावसंख्या झाली त्यातील अर्धी धावसंख्या तर एकट्या गिलनंच केली होती. गिलचं नेतृत्वही या सामन्यात कौतुकास्पद होतं.

?si=UptNA51AS0yAd6Xc हेडिंग्लेच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर सगळीकडून टीका झाली होती. मात्र ही टीका गिलने पॉझिटिव्हली घेतली आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा जोर दाखवून दिला. गिलची फलंदाजी या कसोटीत चमकली मात्र भारताच्या गोलंदाजीतही दोन हिरे चमकेल . विशेष म्हणजे या कसोटीत भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय उतरला होता. मात्र त्याची कमतरता आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांनी पूर्ण केले. या दोघांनी प्रत्येकी अर्धा डझनहून अधिक विकेट घेत इंग्लंडच्या संघाला खिंडार पाडण्याचं काम केलं. सिराजनं पहिल्या डावात ६ विकेट घेतल्या तर आकाशदीपनं दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. याआधी आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट मिळवल्या होत्या. पहिल्या कसोटीत ज्या ज्या चुका टीम इंडियानं केल्या त्यात या सामन्यात सुधारणा झालेली दिसली. लीड्सच्या कसोटीत भारताच्या खेळाडूंनी ८ कॅच सोडले होते. त्याच्या तुलनेने एजबेस्टन कसोटीत भारतीय संघानं चांगली फिल्डिंग केली. काही ठिकाणी त्यांनी संधी गमावल्या मात्र या कसोटीत त्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याचा सकारात्मक परिणामही पाहायला मिळाला. आता तुम्ही म्हणाल की या कसोटी विजयाचे विशेष कौतुक ते कशाला...तर तब्बल ५८ वर्षांनी भारतानं बर्मिंगहॅममध्ये विजयाचा दुष्काळ संपवला. भारताने पहिल्यांदा बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. याआधी ८ सामने खेळवले गेले होते. त्यापैकी ७ सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला होता. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. भारतीय संघाने या मैदानावर पहिला कसोटी सामना जुलै १९६७ मध्ये खेळला होता. यात भारताला १३२ धावांनी पराभव मिळाला होता. आता भारताला तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळायचा आहे. १० जुलैपासून या सामन्याला सुरूवात होतेय. सलग दुसरा सामना जिंकत टीम इंडिया या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघही पराभवातून शिकत जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. गिलच्या नेतृत्वातील यंग टीम इंडियाला पुढच्या कसोटीसाठी खूप खूप शुभेच्छा...
Comments
Add Comment