Cyber Crime : अरे बापरे! सायबर फसवणुकीमुळे भारताला ९ महिन्यात ११ हजार कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार (Cyber Crime) गेल्या काही दिवसांपासून नवीन पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. याविषयी कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत अनेक जण या फसवणुकीला बळी पडले आहेत. भारतामध्ये सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. २०२४ च्या पहिल्या ९ महिन्यात सायबर फसवणुकीमुळे भारताला अंदाजे ११,३३३ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, अशी धक्कादायक माहिती भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने दिली आहे.


सायबर गुन्हेगारांनी आपल्या फसवणुकीच्या पद्धतीत चांगलीच प्रगती केली आहे. नवीन पद्धती, ज्या 'डिजिटल अरेस्ट' म्हणून ओळखल्या जातात, त्या इंटरनेट आणि डिजिटल सेवा वापरणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करतात. यामध्ये, सायबर गुन्हेगार नागरिकांना कायद्याच्या नावावर आणि 'डिजिटल अरेस्ट' होईल अशी भीती दाखवून त्यांच्या बँक खाते किंवा इतर वैयक्तिक माहिती चोरतात. या प्रकाराच्या फसवणुकीत गुन्हेगार एक बनावट कॉल किंवा संदेश पाठवतात, ज्यात त्यांना कायद्याच्या उल्लंघनासाठी अटक होण्याची धमकी दिली जाते. ते नागरिकांना सांगतात की, जर त्यांनी ताबडतोब काही रक्कम पैसे भरले नाहीत, तर त्यांना सायबर गुन्ह्यामुळे अटक केली जाईल. अशा भीतीच्या धमक्यांमुळे नागरिक घाबरून फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात आणि आपले पैसे गमावतात.


यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या प्रकारच्या फसवणुकीला समजून घेऊन योग्य माहिती घेणे आणि अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सायबर सुरक्षा आणि सतर्कता महत्त्वाची आहे. अधिकृत माहिती, सरकारी वेबसाईट्स आणि हेल्पलाइनद्वारे तपासणी करणे आणि कोणत्याही अज्ञात कॉल्स किंवा संदेशांना त्वरित दुर्लक्ष करणे, हे सर्वांची जबाबदारी आहे.


भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) या गृह मंत्रालयाच्या (MHA) विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीत स्टॉक ट्रेडिंगमध्ये झालेल्या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असून अशा फसणुकींमध्ये ४,६३६ कोटी रूपयांचे नुकसान झाले, ज्यासंबंधी २,२८,०९४ तक्रारी मिळाल्या होत्या. तर गुंतवणुकीसंबंधी फसवणुकीच्या १,००,३६० तक्रारीमधून ३,२१६ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर ‘डिजीटल अरेस्ट’ संबंधीत ६३,४८१ तक्रारींमधून १,६१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS)च्या डेटानुसार २०२४ मध्ये जवळपास १२ लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तसेच २०२१ पासून CFCFRMS कडे ३०.०५ लाख तक्रारींची नोंद झाली आहे, ज्यामध्ये २७,९१४ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. ज्यापैकी ११,३१,२२१ तक्रारी या २०२३ मध्ये नोंदवण्यात आल्या, ५१४,७४१ तक्रारी २०२२ आणि १,३५,२४२ तक्रारी या २०२१ मध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’च्या ११५व्या कार्यक्रमात बोलताना ‘डिजीटल अरेस्ट’ फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. कोणतीही सरकारी यंत्रणा एखाद्या व्यक्तीची फोन किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चौकशी करत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले होते. तसेच त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देखील दिला होता. कायद्याच्या चौकटीत डिजीटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार नसतो, यावर जोर देत जागरूकता हाच अशा प्रकारची फसवणूक टाळण्याचा मार्ग असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.


सायबर फसवणुकीसंबंधी गुन्ह्यांच्या विश्लेषणातून असे लक्षात आले आहे की, चोरण्यात आलेले पैसे हे चेकद्वारे, सेंट्रल बँक डिजीटल करंसी (CBDC), फिनटेक क्रिप्टो, एटीएम, मर्चंट पेमेंट आणि ई-वॉलेट यांच्या मध्यमातून काढले जातात. गेल्या वर्षभरात I4Cने अशा पैशांचे व्यवहार करण्यासाठी वापरलेली ४.५ लाख बँक खाती गोठवली आहेत. तर याचाच भाग म्हणून दक्षिण पूर्व आशियामधून चालवली जाणारी सायबर गुन्हेगारांशी संबंधित १७०० व्हॉट्सअ‍ॅप खाती देखील ब्लॉक करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या