सध्या राज्यातील जनता वाढत्या महागाईला कंटाळली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात गरिबांच्या कांद्याने सुद्धा भाव खाल्ला आहे. राज्यात सुशिक्षित बेकारांची वाढती आकडेवारी. त्यात मिळाली तर तुटपुंज्या पगाराची कंत्राटी नोकरी, म्हातारपणीचा आधार नाही. मग सांगा, अशा नोकरीचा काय उपयोग. त्यासाठी मतदार राजाने सर्वसाधारण लोकांची जाणीव असणारा उमेदवार शोधला पाहिजे. म्हणजे तो निवडून आल्यास आपल्या मतदारसंघातील मतदार राजांचे कल्याण करील. असे राज्यातील प्रत्येक मतदारसंघात झाल्यास आपल्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी उमेदवार हा सुशिक्षित व अभ्यास करून विधानसभेत सर्वसाधारण जनतेचे प्रश्न मांडणारा असावा, अशा नि:पक्षपाती काम करणाऱ्या योग्य उमेदवाराला २० नोव्हेंबर, २०२४ रोजी चला तर आपण मतदान करायला जाऊया!
रवींद्र तांबे
महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळात १५व्या विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुका होत असून त्यासाठी ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. तेव्हा निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार कशा प्रकारे एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत हे सुजाण मतदार राजा पाहत आहे. १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंड होतील. नंतर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्यांच्या कार्याची पोहोचपावती मिळेल. त्यासाठी प्रत्येक उमेदवार शक्तिप्रदर्शन व आश्वासनांची खैरात करीत आहेत. तसेच गुप्त भेटी सुद्धा अधूनमधून घेतल्या जात आहेत. म्हणजे मतदार राजाने २३ नोव्हेंबरनंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा आताच मतदार राजाने जागृत राहाणे गरजेचे आहे. तरच मतदानाच्या दिवशी मतदार राजा आपल्या अमुल्य मतदानाने आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवू शकतात. आपल्या राज्यात विधानसभेचे कामकाज मुंबईतील मंत्रालयात चालते. त्यासाठी मतदार राजानी आपल्या मतदारसंघाचे वैभव करणाऱ्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे.
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यात कोविडचा काळ, त्यानंतर राजकीय घडामोडीत विधानसभेचे कामकाज चालले. यात विकासापेक्षा अंतर्गत घडामोडीत अडीज वर्षे केव्हा गेली ही समजली सुद्धा नाही. यात सुशिक्षित बेकार वर्ग सोडा शासकीय सेवकांना सुद्धा आपल्या हक्कांसाठी लाक्षणिक संप करण्याची वेळ आली होती. मात्र निवृत्ती वेतनाचा मार्ग अजून सुटलेला नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यात पहिली विधानसभेची निवडणूक १९६० साली झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करता, आपल्या राज्यातील प्रत्येक उमेदवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली आहे. त्यामुळे मतदार राजाने जागृत राहिले पाहिजे. ते सुद्धा राजकीय उमेदवारांच्या प्रतिष्ठेसाठी नव्हे तर देशातील लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदान केले पाहिजे.
महाराष्ट्र राज्यात तृतीयपंथी मतदार ६१०१ महिला मतदार चार कोटी एकोणसत्तर २,९६,२७९ पुरुष मतदार तर पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस असे एकूण मतदार नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस आहेत. तेव्हा सुजाण राज्यातील मतदार राजाने मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. कारण मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्याच्या विकासासाठी राज्यातील प्रत्येक मतदार राजाने मतदान करायला हवे. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील तरुण असो अथवा ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाचे मत सोन्याहून अधिक समृद्ध आहे हे मतदार राजाने लक्षात ठेवले पाहिजे. आज विधानसभेच्या रिंगणात असणारे भावी लोकप्रतिनिधी कशा प्रकारे विकासाचे मॉडेल प्रचार सभेत मांडत आहेत याची चांगली कल्पना मतदार राजाला आहे. तेव्हा आपल्या विभागाचा सर्वांगीण विकास करणारा व आपल्या विचारांशी प्रामाणिक असणारा नेता निवडा. असाच नेता आपल्या मतदार संघाचा विकास घडवून आणू शकतो. असे झाले तरच आपोआप राज्याचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. तेव्हा अशा प्रामाणिक उमेदवाराला मतदान करा तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशातील लोकशाही अधिक बळकट होईल. केवळ राजकीय पक्षाचा जाहीरनामा किंवा उमेदवारांच्या आश्वासनांना बळी पडू नका. त्यासाठी मतदार राजाने आजचा नाही तर उद्याचा विचार करावा. यातच जनतेचे हित आहे. प्रचारासाठी घरी आलेल्या प्रत्येक उमेदवाराचा सन्मान करा. मात्र स्वत:चे स्वातंत्र्य पायधुळी तुडवू नका. यातच मतदार राजांच्या मनाचा मोठेपणा आहे.
निवडणुका झाल्यानंतर अमुक उमेदवारांनी पैशांचे वाटप केले अशा बातम्या वाचायला मिळतात. तेव्हा अशा व्यवहारापासून मतदाराने चार हात दूर राहावे. मी माझे अमुल्य मत का विकू? यासारखा मूर्ख दुसरा तिसरा कुणीच नसेल. जो उमेदवार मतदानासाठी पैशाचे आमिष दाखवेल त्याला मी मतदान करणार नाही अशी मतदार राजाने गोपनीय शपथ घ्यावी. म्हणजे मतदानापूर्वीच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल. असे राज्यातील प्रत्येक मतदार राजाने केले पाहिजे. म्हणजे आपल्या मनातील लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो. तोच खरा मतदारसंघातील खऱ्या अर्थाने विकासक होऊ शकतो. कारण लोकांनी त्यांना निवडून दिलेल्याची जाणीव असते. असे झाल्यास महाराष्ट्र राज्याचा विकास होण्याला वेळ
लागणार नाही.