मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून अनेक आश्वासनांची खैरात दिली आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
"आम्ही हे करू" अशा नावाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला ब्लू प्रिंटवरून हिणवले गेले होते. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट २००६ मध्ये आणेन म्हटले आणि २०१४ ला आणली, मात्र गेल्या १० वर्षात त्याबद्दल कुणीच विचारले नाही, त्याच ब्लू प्रिंटमधले मुद्दे यात आहेत, असे राज ठाकरेंनी सांगितले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे.
नवी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आता येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी ...
मी राज्याची २००६ रोजी ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ ला आली. पण मला या काळात हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या १० वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण विषय बदलले नाहीत, प्रश्न बदललेले नाहीत, अद्यापही तेच प्रश्न आहेत अद्यापही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.
मराठी अस्मिता, गड-किल्ले संवर्धन यांपासून ते इंटरनेट, औद्योगिक क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांतील गोष्टी कशा सोडवू शकतो, याची सविस्तर माहिती देताना काही उपायही दिले आहेत.
जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्यभरात शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार, असे म्हटलं आहे. पण त्याऐवजी राज्यात विद्यामंदिरं उभी करणे महत्त्वाचे आहे आणि राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग शिवाजी महाराजांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातील मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यात 'लाडकी बहीण योजना' किंवा 'महालक्ष्मी योजना' यासारख्या योजनांचा समावेश का नाही, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, 'याचं कारण महाराष्ट्राचं एकूण आर्थिक गणित पाहिल्याशिवाय मी असल्या घोषणा करु शकत नाही. असल्या घोषणांना अर्थ नसतो. महाराष्ट्रावर आर्थिक बोजा न येता या योजना सुरु राहिल्या तर मी त्याला गिफ्ट म्हणेन. पण उद्या या गोष्टी सुरु राहिल्या नाहीत तर मी या योजनांना लाच म्हणेल. अशा योजना सुरु करताना राज्याचा आर्थिक ढाचा बिघडता कामा नये. सरकारकडून महिलांना पैसे मिळतात, याचा आनंदच आहे. पण या सगळ्यातून आपण काही वेगळे खड्डे तर खणून ठेवत नाही ना, हेदेखील तपासले पाहिजे'.
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द
राज ठाकरे यांची १७ तारखेला शिवाजी पार्कवर सभा होणार होती. मात्र, ती सभा रद्द करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी आज दिली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'माझी १७ तारखेला शिवाजी पार्कवरची सभा आहे, पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत', असं ते म्हणाले.
असा असेल मनसेचा जाहीरनामा
- मुलभूत गरजा, पुरेसं अन्न,
- पिण्याचं पाणी, दर्जेदार जीवनमान,
- कायदा, सुव्यवस्था, बालसंगोपन,
- प्राथमिक शिक्षण आणि रोजगार,
- महिला सुरक्षा, क्रिडा
- दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन,
- महाराष्ट्राभर शहरांचे जाळे,
- घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण
- मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता.
- राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण,
- प्रशासन आणि उद्योग नियंत्रण,
- कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण.
- मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार,
- दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी,
- डिजिटल जगात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी,
- गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.