
हलकं-फुलकं - राजश्री वटे
नेहमीच हा प्रश्न पडतो मनाला... पितृपक्षच का? मातृपक्ष का नसतो... देवा... माहिती आहे मला देवाला चांगली माणसे आवडतात... जीवाभावाची किती माणसं तू बोलावून घेतलीस तुझ्याकडे... जशी तुला हवी असतात, तशी आम्हालाही ती हवी असतात ना...
आई फार प्रेमळ होती रे... तिला तू बोलावून घेतलंस... तुलाही तिच्या प्रेमाचा, मायेचा अनुभव आलाच असेल. फार सुगरण हं... खाल्लंच असशील तिच्या हातचं... खाल्ल्यावर तिच्या पदराला हात पुसला की नाही... वेगळंच सुख असतं त्यात! करून बघ... एकदम भारी वाटतं! असे म्हणतात देवा... की देव सगळीकडे तर जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईचं रूप घेतलं आहे. खरंच, तिच्या रूपात साक्षात भगवंताचा सहवास लाभतो!
जन्म होतो... सुरुवातीची दोन अडीच वर्षे नीट बोलताही येत नसतं... आईशी संवाद फक्त तिच्या प्रेमळ स्पर्शातून होत असतो. नंतर या जगात जगण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. शिक्षण... नोकरी... अमुक तमुक... यात व्यस्त होतं जातं आयुष्य... तिच्याच जवळ असतो पण हवा तसा संवाद घडत नाही... नुसतं धावत राहतो... जेव्हा हे धावणं थांबतं... एक दीर्घ श्वास घेतो... आता आईशी संवाद साधावा निवांत... तिने आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्या असतात... जरा विसावू तिच्याजवळ... सुरकुतलेल्या कष्टाळू पण तरीही तिचा मऊ मुलायम हात हातात घेऊन... तो सुखद स्पर्श सामावून घेऊ तनामनात!
असं वाटतं की, कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या त्या पूर्ण कराव्यात तिच्यासाठी... काही चुकलं असेल तर माफी सुद्धा मागायची होती... पण नेमकं तेव्हाच तू बोलावून घ्यावस तिला... तुला सुद्धा हेवा वाटला!
देवा... पण तू बघ... तुझ्यावरही ती तेवढच प्रेम करत असेल जेव्हढे तिच्या लेकरांवर करते. शेवटी ती माय आहे... तिची माया कधीच आटत नाही! तिच्या सहवासात जे प्रेम वाट्याला आले... आता ते तुला मिळत आहे... नीट सांभाळ तिला... म्हणतातच ना... स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!!