मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाची घोषणा झाल्याने चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, एसटी ही गावोगावी पोहोचणारी महत्त्वाची सेवा आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे संप टाळा आणि चर्चेतून तोडगा काढू.
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता, आणि इतर वित्तीय मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांसाठी ४८४९ कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होईल असे आश्वासन दिले आहे आणि आजच्या बैठकीत तातडीचा तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.