गांधीनगर: गुजरातमध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. सुरत, कच्छसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या ४८ तासांत मुसळधार पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी जमा झाले आहे. यातच हवामान विभागाने पावसापासून इतक्यात दिलासा नसल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसामुळे राजकोट येथील रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे वाहने पूर्णपणे बुडाली आहेत. घरांमध्ये इतके पाणी भरले आहे की वयस्कर व्यक्तींना खांद्यावर उचलून रेस्क्यू केले जात आहे. रस्त्याच्या वर वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका आहे की एका बाईकस्वाराने आपला बॅलन्स गमावला. त्याने स्वत:ला कसेतरी वाचवले मात्र बाईक पाण्यात वाहून गेली.
राजकोटचे रामनाथ महादेव मंदिरही अजूनही पावसाच्या विळख्यात आहे. आजूबाजूच्या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेले आहे. गुजरातच्या खेडामध्ये शेढी नदीची पाण्याची पातळी इतकी वाढली की आजूबाजूचे गाव जलमग्न झाले.
हवामान विभागाचा रेड अलर्ट
हवामान विभागाने कच्छ, सौराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अहमदाबाद, खेडा, आणंद, दाहोद, महिसागर, वडोदरा, पंचमहल, छोटाउदेपूर, भरूच, नर्मदामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर सूरत, तापी, नवसारी, डांग, वलसाड, दमन आणि दादरा नगर हवेली येथेही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.