मुंबई: श्रीलंकेने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला ३२ धावांनी हरवले. टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणे चांगली सुरूवात मिळाली मात्र मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याने भारताला हा पराभव स्वीकारावा लागला.
श्रीलंकेच्या संघाने तब्बल ३ वर्षांनी एखाद्या वनडे सामन्यात भारताला हरवले. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास शिवम दुबे आणि केएल राहुल शून्यावर बाद झाले तर श्रेयस अय्यरलाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यजमान श्रीलंकेसाठी जॅफरी वँडरसन सगळ्यात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने एकूण ६ विकेट मिळवले.
श्रीलंकेने पहिल्यांदा खेळताना २४० धावा केल्या होत्या. भारत आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरूवात करून दिली. दोघांमध्ये ९७ धावांची भागीदारी झाली आणि यातच कर्णधार रोहितने २९ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने आपल्या खेळीदरम्यान ४४ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. या दरम्यान त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. दुसरीकडे गिलने ३५ धावांची भागीदारी केली. त्यांच्या ९७ धावांच्या भागीदारीनंतर एकामागोमाग एक विकेट पडू लागल्या.
५० धावांत गमावले ६ विकेट
भारतीय संघाने एका वेळेस विकेट न गमावता ९७ धावा केल्या होत्या मात्र रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर फलंदाज येत जात राहिले. कर्णधार बाद झाल्यानंतर काही वेळात गिलही बाद झाला. दुबे चार बॉलवर एकही धाव न करता बाद झाला. विराट कोहली १४ धावा करू शकला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अनुक्रमे ७ आणि शून्यावर बाद झाले. या पद्धतीने भारताने विकेट न गमावता ९७ धावांवरून ६ बाद १४७ हा स्कोर केला. ५० धावांच्या आत ६ विकेट गमावल्याने टीम इंडिया संकटात आली. अक्षर पटेलने ४४ धावांची खेळी केली. मात्र तो अधिक काळ भारताचा पराभव टाळू शकला नाही.
३२ वर्षांनी मिळवला विजय
श्रीलंकेने एखाद्या वनडे सामन्यात भारतावर शेवटचा विजय जुलै २०२१मध्ये मिळवला होता. श्रीलंकेने त्यावेळेस टीम इंडियाला ३ विकेटनी हरवले होते.