मराठवाड्यात १६ हजार रोजगार निर्मिती होणार
मुंबई : जपानच्या टोयोटा कंपनीने किर्लोस्कर कंपनी समवेत सामंजस्य करार केला असून महाराष्ट्रात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. टोयोटाच्या या उद्योगातून संभाजीनगरमध्ये ८ हजार बेरोजगारांना रोजरागाराची संधी उपलब्ध होणार आहे. टोयोटाचा हा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑरिक सिटीमध्ये ८५० एकरमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. तर JSW ग्रीन मोबिलीटीचा २७ हजार कोटींचा दुसरा प्रकल्पही मराठवाड्यात उभारण्यात येणार आहे. JSW ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा प्रकल्प बिटकीनमध्ये उभारणार आहे. या प्रकल्पातून ५ हजार २०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच लुब्रिझोल कंपनीसुद्धा २ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून ९०० जणांना रोजगार मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगातदेखील एक क्रांती येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ८५० एकर जागा देण्यात आली आहे.
यावेळी या कराराचे वर्णन ‘ऐतिहासिक’ या शब्दात करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत पण टोयोटा नसल्याने ते अपूर्ण होते. आता राज्यात टोयोटा असल्याने हे सेक्टर पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करेल. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात रोजगार निर्मिती तर होणारच आहे पण आर्थिक प्रगतीही साध्य होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे. हा करार अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात जेएनपीटीसारखे बंदर आहे आणि त्याच्या तीनपट मोठे वाढवण बंदर होणार आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. तसेच जालनामध्ये ड्राय पोर्ट होणार आहे. निर्यातीसाठी उत्तम असल्याने मराठवाड्यात गुंतवणूक म्हणजे निर्यातीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.