मुंबई : मुंबईत हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती पाहता प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यामुळे म्हाडाची लॉटरी ही अशा नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यातच आता म्हाडा गोरेगावमध्ये आणखी २५०० घरं बांधण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.
गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवा गृहप्रकल्प हाती घेणार आहे. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर २ हजार ५०० घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढणार : म्हाडा
म्हाडाच्या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळानं सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील २ हजार ७०० घरं सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती. मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारनं विकासकाकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाकडे सोपवला.
दरम्यान, विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचं काम सुरू केलं आहे. मात्र, ते अर्धवट सोडलं. या अर्धवट घरांसाठीच मंडळाने २०१६ मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळानं मूळ रहिवाशांच्या ६७२ घरांसह सोडतीतील घरं पूर्ण करण्याचं काम २०२२ मध्ये हाती घेतलं आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. असं असताना देखील मंडळानं आपल्या हिश्श्यातील २ हजार ५०० घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १ हजार ५०० घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असंही जयस्वाल यांनी सांगितलं आहे.