मुंबई : मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने (Mumbai Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना त्यातून पायवाट शोधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचाही मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. सानपाडामधील (Sanpada) भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणात पाऊसपाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडामधील भुयारी मार्गात ४ फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब होत असल्याने काहीकाळासाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे भर पावसात या ठिकाणी आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.