सूर्यकांत आसबे
सोलापूर : आषाढी एकादशीचा महासोहळा बुधवारी तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये (Pandharpur) मोठ्या भक्तीभावाने साजरा होत असून यासाठी किमान १२ लाखाहूनअधिक भाविक पंढरीत दाखल झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक श्री. विठ्ठल व रुखुमाईची शासकीय महापूजा करणार आहेत.
गेली अनेक दिवस पायी येणारे पालखी सोहळे लाखो भाविकांसह मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी विठुरायाच्या नगरीत दाखल झाले आहेत. आषाढी एकादशीसाठी यंदा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.भाविकांची संख्या लक्षणीय दिसत असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दशमी दिवशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या सायंकाळी पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. वाखरी येथील मुक्काम आटोपून व सकाळी संत भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर पंढरीतून या संतांच्या भेटीसाठी गेलेल्या पालख्यांसह हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. पंढरपूर शहराच्या हद्दीवर इसबावी येथे पालख्या व दिंड्यांचे अत्यंत उत्साहात शहरवासीयांनी स्वागत केले.
दरम्यान आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब मंगळवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या समवेत अनेक मंत्री सुद्धा महापूजेसाठी मंदिरात उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी पंढरपूर शहर भाविकांनी फुलून गेले होते. हरिनामाच्या गजरात दिंड्या व पालख्या पंढरीत दाखल होत होत्या. श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जागा मिळवण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
पत्राशेड भरून दर्शन रांग पुढे गोपाळपूरच्या दिशेने गेली आहे. यंदा यात्रेचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि त्यांच्या टीमने नेटके केले आहे. बंदोबस्तासाठी सुद्धा हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात बंदोबस्त असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत भाविकांना आणण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हजारो फेऱ्या करण्यात येत आहेत. रेल्वेनेसुद्धा जास्त गाड्या सोडून भाविकांची सोय केली आहे. भाविकांना राहण्यासाठी चंद्रभागेच्या परिसरात असलेल्या ६५ एकर जागेमध्येसुद्धा वारकऱ्यांसाठी मोठी सोय करण्यात आली आहे. वाळवंटात दशमी दिवशी हजारो विठ्ठल भक्तांनी चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी केली होती.
आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा बुधवारी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. पंढरपूर शहरातील सर्व मठ, लॉज, भक्त निवास भाविकांनी फुल्ल झाले आहेत. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली असून चंद्रभागा तीरावर भाविकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग १० पत्राशेड पूर्ण करून गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून अतिरिक्तपणे नियोजन करण्यास मोठी गती देण्यात आली आहे. पाणी, स्वच्छता, निवारा आणि आवश्यक त्या सेवासुविधा भाविकांना पोहोचविण्यात जिल्हा व पोलिस प्रशासनाला यश येत आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…