
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७ जुलै रोजी आषाढी एकादशी असून पंढरपूरच्या दिंडीत भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. पंढरपुरमध्ये दाखल होण्यासाठी पालख्या पुढे सरकत असताना राज्य सरकार (State Government) देखील वारकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्याचे दिसत आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. अशातच आता राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ (Toll Free) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केला. तसेच या संदर्भातील जीआर सुद्धा राज्य सरकारने काढला आहे. यामध्ये पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्यभरातील सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना आजपासून २१ जुलैपर्यंत टोलमाफी जाहीर केली आहे.
दरम्यान,वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स दिले जाणार आहेत. त्यासोबत गरज भासल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महामंडळाच्या बसलाही टोलमाफी
महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व नाक्यांवर उपरोक्त कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.