मंत्रीपद सोडणार असल्याच्या चर्चांवर सुरेश गोपी यांनी दिली स्पष्टता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा (NDA Government) काल शपथविधी सोहळा पार पडला. नव्या मंत्रिमडळाने यात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. यात पहिल्यांदाच केरळमधून निवडून आलेले भाजपा खासदार सुरेश गोपी (Kerala BJP MP Suresh Gopi) यांचाही समावेश होता. मात्र, काल शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या काही माध्यमांतून प्रसारित करण्यात आल्या. यावर सुरेश गोपी यांनी स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.
सुरेश गोपी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटले आहे की, 'मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही मीडिया प्लॅटफॉर्म पसरवत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत.' त्यांच्या या ट्वीटमुळे ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काय होती गोपींबाबतची अफवा?
माध्यमांमध्ये बातमी पसरवण्यात आली की शपथविधीनंतर दिल्लीच्या एका प्रादेशिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना सुरेश गोपी यांनी मंत्रीपद नको असल्याची इच्छा बोलून दाखवली. आपण या मंत्रीपदाची मागणी भाजपाकडे केली नव्हती, त्यामुळे मोदीजींनी मला यातून मुक्त करावं, असं सुरेश गोपी म्हणाल्याचा दावा माध्यमांनी केला. सुरेश गोपी हे प्रथम एक अभिनेते आहेत, त्यांनी काही फिल्म्स साईन केल्या आहेत, त्यांना त्या फिल्म्स सोडणं जमणार नाही, त्यामुळे मंत्रीपद नको, अशा चर्चा माध्यमांतून रंगल्या होत्या.
दरम्यान सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे पहिले खासदार आहेत. त्यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सीपीआयचे सुनील कुमार यांचा सुमारे ७५ हजार मतांनी त्यांनी पराभव केला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारादरम्यान अभिनेता ते खासदार झालेले सुरेश गोपींनी त्रिशूरसाठी एक केंद्रीय मंत्री, मोदीची गॅरंटी या घोषणेवर निवडणुकीचा प्रचार केला होता.