Tuesday, May 13, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : ४ जूनला मशाल विझणार आणि हातात केवळ आईस्क्रिमचा कोन उरणार!

Nitesh Rane : ४ जूनला मशाल विझणार आणि हातात केवळ आईस्क्रिमचा कोन उरणार!

भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार


नितेश राणे यांची जहरी टीका


मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काल राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याचा सर्वस्वी दोष सरकारला दिला. जिथे मविआ जिंकण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्रांवर दिरंगाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यावर आज भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'ठाकरेंच्याच चेहर्‍यावर काल पराभव दिसत होता', अशी टीका नितेश राणे यांनी केली.


नितेश राणे म्हणाले, ज्याने कधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही असा संजय राजाराम राऊत आज सकाळी निवडणुकीचं आकलन आणि विश्लेषण करताना दिसला. ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या दिवशी शेंबड्यासारखा रडताना दिसला. पराभव काय असतो याचा चेहरा पाहायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यानंतर ते जाणवत होतं. ४ जूननंतर पुन्हा एकदा मोदींजीच्याच नेतृत्वातील सरकार येणार हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमुळे आणि आजच्या संजय राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालं आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.


यानिमित्ताने मी गृहगविभागाला पुन्हा एकदा विनंती करेन की, लवकरात लवकर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचं पासपोर्ट जप्त करावं. कारण ४ जूननंतर त्यांचं सरकार नसेल हे सिद्ध झाल्याने ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.


ज्या पद्धतीने काल मतदान झालं, त्यातून सरळ स्पष्ट झालं आहे की, महायुतीला त्या त्या मतदारसंघातल्या लोकांनी मनापासून स्विकारलं आहे. आमचे सगळेच उमेदवार घासून नाही तर ठासून निवडून येत आहेत. त्याचमुळे मविआच्या नेत्यांचं कालपासून जे रडगाणं सुरु झालं आहे, ते महायुती ४५ चा आकडा गाठणार याचाच पुरावा आहे.


४ जूनला मशाल विझणार


मशालीला जास्त मतदान होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मतदानात दिरंगाई करण्यात आली, असा आरोप संजय राऊतांनी केला. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले की, ४ जूनला मशाल विझणार आहे आणि हातात केवळ आईस्क्रिमचा कोन उरणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विझवून टाकली आहे. त्यांना स्वखुशीने ज्यांना मतदान करायचं होतं, त्यांनाच त्यांनी मत दिलं आहे. त्यामुळे ज्याने कधीच साधी निवडणूक लढवली नाही, त्याने आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवू नयेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



मविआच्या काळात पोलिसांचा घरगड्याप्रमाणे वापर


पुणे येथील पोर्शे कार अपघाताप्रकरणी संजय राऊतांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. यावर नितेश राणे म्हणाले, अपघातानंतर सुरु असलेल्या कारवाईदरम्यान तुम्हाला पुणे पोलिसांची कार्यक्षमता दिसली नाही का? हे महायुतीचं सरकार आहे, मविआचं नव्हे. जसं मविआच्या काळात दिशा सालियनच्या केसबाबत लपवालपवी झाली, तसं पुण्याच्या केसबाबत होणार नाही. परमवीर सिंग, त्रिमुखेय, सचिन वाझे या सगळ्या पोलीस खात्याला कसं वापरलं, हे आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलं आहे. म्हणून तर ७२ दिवस सीबीआयला येण्यापासून हे लोक रोखत होते. मविआच्या काळात जसा पोलिसांचा घरगड्याप्रमाणे वापर होत होता, तसा आम्ही करत नाही. योग्य ती कारवाई होईल, असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.



बारावीत यंदा कोकण पॅटर्न पुन्हा दिसला


नितेश राणे यांनी सुरुवातीला राज्यातील बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर राज्यात पुन्हा एकदा कोकण पॅटर्न दिसला, कोकण विभागाने उत्तीर्णतेच्या टक्केवारीत प्रथम क्रमांक पटकावला याबाबत त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. कोकणाचा मान विद्यार्थ्यांनी वाढवत राहावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Comments
Add Comment