रस्त्यावर आढळली फ्लेमिंगोची पिसे आणि सांगाडे; मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट
मुंबई : मानवाने केलेल्या पर्यारणाच्या र्हासामुळे अनेक पक्ष्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. काही प्राणीपक्ष्यांच्या जातीप्रजाती नष्ट झाल्या असून जी उर्वरित निसर्गसंपदा आहे तिच्या संवर्धनासाठी (Conservation) मोहिमा राबवाव्या लागत आहेत, इतकी बिकट परिस्थिती आली आहे. त्यातच घाटकोपरमधून (Ghatkopar) समोर आलेली एक घटना धक्कादायक आहे. घाटकोपर पूर्व परिसरात अचानक २५ ते ३० फ्लेमिंगो पक्ष्यांच्या (Flamingo birds) मृतदेहांचे अवशेष आढळून आले. या फ्लेमिंगोंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई उपनगर परिसरात काल रात्री घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर (Ghatkoper Andheri Link Road) फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृतदेहांचे मोठ्याप्रमाणावर अवशेष आढळून आले. फ्लेमिगोंच्या शरीराचे तुकडे आणि पिसं रस्त्यावर इस्ततत: विखुरली होती. २५ ते ३० फ्लेमिंगो मृत होऊन आकाशातून खाली पडले असावेत, असा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस, पक्षी मित्र दाखल झाले असून या फ्लेमिंगोच्या मृत्यूचा शोध घेत आहेत.
फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा आकाशात उडत असताना एखाद्या विमानाची धडक लागून अख्खा थवाच मृत्युमुखी पडला असावा, अशी शक्यता पक्षीप्रेमींनी बोलून दाखवली आहे. मात्र, काहीजण फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू विमानाच्या धडकेने होणे शक्य नाही, असेही सांगत आहेत. मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वी विमाने घाटकोपर परिसरातून जातात. त्यामुळे विमाने कमी उंचीवरुन उडत असतात. त्यामुळे विमानाच्या धडकेने फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
फ्लेमिंगोंच्या अधिवासावर खासगी विकासकांची वक्रदृष्टी
मुंबईच्या खाडीवर येणारे गुलाबी रंगांचे फ्लेमिंगो पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचा विषय असतात. नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडी किनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. नेरूळ येथील चाणक्य तलाव आणि डिपीएस स्कूलच्या शेजारील तलावात फ्लेमिंगो पक्षी मोठ्याप्रमाणावर उतरतात. मात्र, फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास असलेल्या परिसरावर खासगी विकासकांची वक्रदृष्टी पडली आहे. या खासगी बिल्डर्सकडून फ्लेमिंगो पक्षांसाठी आरक्षित असलेली पाणथळ जागा निवासी संकुल बांधण्यासाठी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जवळपास ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभं राहणार आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींना आवाज उठवला आहे.