Cyber crime : शक्कल लढवत सायबर चोरट्यांनी महिलेकडून लुबाडले तब्बल २५ कोटी रुपये!

मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; काय होती चोरांची ट्रिक?


मुंबई : हल्लीच्या जगात सायबर गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर चोरटे आणि हॅकर्स यांनी रचलेल्या जाळ्यात कोणत्याही गोष्टीची शहानिशा करणे कठीण होऊन बसते आणि व्यक्ती अडकत जातो. भलीमोठी रक्कम चोरट्यांनी लुबाडल्यानंतर ती परत मिळवणेही अशक्य होऊन बसते. अशीच एक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगर भागात घडली आहे. हा मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठा वैयक्तिक सायबर स्कॅम असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.


मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेची २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेला सायबर चोरट्यांचा पहिला फोन आला, त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात सदर महिलेने भीतीच्या सावटाखाली या चोरट्यांना २५ कोटी रुपये पाठविले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला एका बहुराष्ट्रीय कंपनीतील निवृत्त संचालक आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडित महिलेला व्हॉट्सॲपवर कॉल आला. सदर व्यक्तीने ती टेलिकॉम विभागातील अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेचे तीन मोबाइल क्रमांक लवकरच बंद करणार आहोत, असे सांगितले. पीडित महिलेने याचे कारण विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांकडे कॉल ट्रान्सफर करत असून तेच याबद्दल माहिती देतील, असे सांगितले.


यानंतर दुसऱ्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिला मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोप आहे, अशी बतावणी केली. महिलेच्या विरोधात मनी लाँडरिंगची तक्रार दाखल झाली असून महिलेचे मोबाइल क्रमांक आणि आधार कार्ड या खटल्याशी लिंक झाले आहे, असेही समोरून महिलेला सांगण्यात आले. यानंतर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीकडे कॉल ट्रान्सफर केला. तिसऱ्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून पीडित महिलेला धमकावले. जर या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर महिलेला त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवावे लागतील. चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे परत करू, असेही महिलेला सांगण्यात आले.



शेअर्स विकले, दागिने गहाण ठेवले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांच्या धमक्यानंतर पीडित महिलेने स्वतःचे आणि आपल्या आईचे शेअर्स विकले. तसेच म्युच्युअल फंडची गुंतवणूक काढून घेतली तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले आणि ते पैसे सायबर चोरट्यांना पाठविले. हा सर्व घटनाक्रम दोन महिन्यांपासून सुरू होता.



रिझर्व्ह बँकेकडे पैसे जाणार असल्याची थाप मारली


दरम्यान, सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावानेच चालू बँक खाते उघडले होते. या खात्यात पैसे जमा करावेत, असे महिलेला सांगण्यात आले. हे पैसे रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच या पैशांची पावती स्थानिक पोलीस स्थानकातून मिळेल, असेही महिलेला सांगण्यात आले. महिलेने २५ कोटी पाठविल्यानंतर तिला तिचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आतापर्यंत ३१ बँक खाती गोठविली आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका