जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना
अलिबाग : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान-मोठ्या वाहनांसाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून, बहुतांश काम पूर्ण झालेले आहे; परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (वरंध) ते ९६/७००(रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून, रस्त्याची रुंदीचे काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे, तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही. सदर कालावधीकरिता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा, तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड-कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.