माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की, त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वानाचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, “खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू?”



दुसरा रोग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत् आपले आहे. मात्र, आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजन-पूजन चालू आहे; परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलटपक्षी, भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले. बायको, मुले, नोकरी-धंदा, घरदार इ. कितीतरी गोष्टी, की ज्यांपासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते, त्या गोष्टी पुरविल्या; पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून, कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार?



आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण, वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती ! असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची ! उलट आजची स्थिती पाहावी तर ‘सुधारणा’ जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे.



परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही.



आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार; परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ ‘समजून’ जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. ‘मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे’, असे वाटणे जरूर आहे.



तात्पर्य : ज्याची हाव, म्हणजे वासना, पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही.


Comments
Add Comment

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि

तृतीयपंथियांचा आक्रोश

ऋतुराज ऋतुजा राजेश केळकर अचानक एक बाळाचा आक्रोश हवेत पसरला आणि सगळे थरारले. तिसऱ्या मजल्यावरील बंद घरातून तो

आत्मबोधाचा शाश्वत आनंद

अर्चना सरोदे मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा हा जीव

संत निळोबाराय

नाही त्या उरले दुजे ने कृष्णवीण। बाह्य अंतःकरण कृष्ण झाला ॥ जीवाचाही जीव शिवाचाही शिव । देही देहभान कृष्ण झाला

संत तुकाराम

लवण मेळविता जळे लवण मेळविता जळे। कार्य उरले निराळे॥ तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो अग्नी कर्पूराच्या मेळी। काय