Maratha Reservation : मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; काय आहे कारण?

करोडो मराठ्यांनी सरकारच्या वेबसाईटवर ई-मेल करण्याचं जरांगेंचं आवाहन


मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची पुढची दिशा


छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला (Maratha Samaj) राज्य सरकारने १० टक्के आरक्षण (Maratha Reservation) दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) असमाधानी आहेत. ते सातत्याने मागण्या बदलत असल्याचा आरोप काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. मनोज जरांगे आता ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यासाठी ते अत्यंत आक्रमक झाले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून आरोप केले. यावर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांनी तीव्र नाराजी दर्शवली. यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


मनोज जरांगे यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचा मंडप पोलीस हटवत असल्याचे त्यांना समजले आणि ते उपचार सोडून जालन्यामध्ये यायला निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घ्यायला सुरुवात केली.


यानंतर आज आंदोलनाबद्दल सांगताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.


पुढे जरांगे म्हणाले की, “दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नयेत आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे.



ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ठाम


मनोज जरांगे म्हणाले की, “मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेन. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जातीय द्वेष सुरू आहे. मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना, मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जात की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.

Comments
Add Comment

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं