Raj Thackeray : बाळा नांदगावकर यांनी ३२ वर्षे जपून ठेवलेली 'ती' वीट राज ठाकरेंना दिली भेट

काय आहे त्या वीटेमागची कहाणी?


मुंबई : अनेक राजकीय नेते एकमेकांना महागड्या वस्तू भेट म्हणून देत असल्याचे आपण पाहिले आहे. पण मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) एक आगळीवेगळी भेटवस्तू दिली आहे. ही भेटवस्तू एका महागड्या वस्तूपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. कारण बाळा नांदगावकर यांनी ती ३२ वर्षे आपल्याजवळ जपून ठेवली होती. शिवाय त्या वस्तूला एक इतिहासही आहे. आज बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर जाऊन त्यांना एक खास वीट (Brick) भेट म्हणून दिली.


३२ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ ला जेव्हा बाबरीचा (Babri Masjid) ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जे शिवसैनिक गेले होते, त्यामध्ये बाळा नांदगावकरही होते. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा त्यातून ही वीट बाळा नांदगावकरांनी आणली होती. त्यांनी दोन वीटा आणल्या होत्या. त्यापैकी एक वीट त्यांनी माजगावचं कार्यालय बांधताना त्याखाली ठेवली होती. मनसेत प्रवेश केल्यानेतर त्यांनी हे कार्यालय शिवसेनेकडे सुपूर्त केलं. तर दुसरी वीट त्यांनी जपून ठेवली होती व आज ती राज ठाकरेंना त्यांनी भेट म्हणून दिली.



आठवणी ताज्या करताना काय म्हणाले बाळा नांदगावकर?


राज ठाकरेच आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली. ते म्हणाले, “तो प्रसंग फार बाका होता. तो प्रसंग आठवला की, फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायच्या. तेव्हा माहित नव्हतं की परत जिवंत येऊ की नाही. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी बाबरीची वीट सोबत आणली होती. त्याला आता ३२ वर्षं झाली.


माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. २२ जानेवारीला राम मंदिर लोकांसाठी खुलं झालं आणि २३ तारखेला बाळासाहेबांचा जन्म दिवस आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.



राज ठाकरे म्हणाले, वीट हातात घेऊन बघितली तर...


राज ठाकरे म्हणाले, “बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल. तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत”, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी यावेळी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असंही राज ठाकरे म्हणाले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.