मृतदेह स्मशानभूमीतील बारव मध्ये टाकले
राहुरी प्रतिनिधी: राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव ( रा. मानोरी, ता. राहुरी) असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या संशयावरून राहुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोन संशयित पसार आहेत. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.
राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून अचानक बेपत्ता झाले. यामुळे वकील संघटना आणि तालुक्यात खळबळ उडाली. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार राहुरी पोलिसांकडे दाखल होताच, त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली.
पोलिसांच्या चौकशीसमोर तिघा संशयितांनी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी संशयितांनी आढाव दाम्पत्याबरोबर केलेल्या घटनेची माहिती दिली. आढावा दाम्पत्याची हत्या करून त्यांना राहुरीतील उंबरे गावातील स्मशानभूमी लगत असलेल्या बारवमध्ये मोठ्या दगडांना बांधून टाकल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिथे धाव घेत बारवमधील पाणी चार ते पाच विद्युतपंपाने उपसून आढाव दाम्पत्यांचे मृतदेह बाहेर काढले. या हत्येत आणखी दोन जण संशयितांची नावे ताब्यात घेतलेल्यांनी सांगितली आहेत. ते पसार असून, गुन्हे शोध पथक त्यांचा शोध घेत आहे. मनीषा यांच्या माहेरकडील मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे