हैदराबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताची धावसंख्या दिवसअखेर ७ बाद ४२१ झाली आहे. भारताकडे १७५ धावांची आघाडी झाली आहे. जडेजा ८१ धावांवर नाबाद आहे. अक्षर पटेलने त्याला चांगली साथ दिली आहे. अक्षऱ ३५ धावांवर नाबाद आहे.
तिसऱ्या दिवशी भारत पहिल्या सेशनमध्ये फलंदाजी करत इंग्लंडला दुसऱ्या डावाच्या फलंदाजीसाठी निमंत्रित करू शकतो. सामना पूर्णपणे भारताच्या दिशेने दिसत आहे. रवींद्र जडेजाने या डावात सुंदर फलंदाजी केली. त्याने संयमी खेळी करताना भारताला चारशेहून अधिक धावसंख्या गाठून दिली.त्याचमुळे भारताला पावणेदोनशे धावांची आघाडी घेण्यात यश मिळाले.
याआधी इंग्लंडला पहिल्या डावात केवळ २४६ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी कमाल करत इंग्लिश संघाला अडीचशे धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. बेन स्टोक्सने कर्णधाराला साजेशी खेळी केली. स्टोक्सने ८८ बॉलचा सामना करताना ७० धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. जॉनी बेअरस्ट्रॉने ५८ चेंडूंचा सामना करताना ३७ धावा केल्या. यात ५ चौकारांचा समावेश आहे. बेन डकेटने ३५ धावांची खेळी केली. जॅक क्रॉलीने २० धावा केल्या.
टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा आणि रवींचंद्रन अश्विनने ३-३ विकेट मिळवल्या. जडेजाने १८ ओव्हरमध्ये ८८ धावा केल्या. अश्विनने २१ ओव्हरमध्ये ६८ धावा दिल्या. अक्षऱ पटेलने १३ ओव्हरमध्ये ३३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहलाही २ विकेट मिळवण्यात यश मिळाले.