
जाणून घ्या मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया
मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) काल रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha) पार पडली. यामुळे हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण देशभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य आणि ऐतिहासिक अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यासाठी जाणून घेऊयात मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया (Schedule and Booking Process).
मंदिर किती वेळ असणार खुले?
अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत दर्शन खुले असणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. पुढे दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.
आरतीची वेळ काय असेल?
मंदिर सर्वांसाठी खुले होण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे ६:३० वाजता या ठिकाणी जागरण/श्रीनगर आरती पार पडेल. या आरतीला केवळ त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. तसंच संध्या आरती ही सायंकाळी ७:३० वाजता असणार आहे. यासाठी देखील केवळ बुकिंग असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
बुकिंग प्रक्रिया कशी असणार?
पहाटेच्या जागरण आरतीसाठी भाविकांना आधीच्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंग करावं लागणार आहे. किंवा आरतीच्या ३० मिनिटे आधी श्री राम जन्मभूमी कॅम्प ऑफिसमधून आरतीचा पास मिळवता येईल. संध्या आरतीसाठी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा त्याच दिवशी बुकिंग करू शकता.
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. बुकिंग करण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत सरकारी आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे. याच वेबसाईटवर आरतीसाठी ऑनलाईन पासेस बुक करता येतील. विशेष म्हणजे, आरतीचे पासेस अगदी मोफत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.