आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) आज रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. देशविदेशातील रामभक्तांना या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचं निमंत्रण उशिरा देण्यात आलं. यावरुनही अनेक राजकीय वाद प्रतिवाद झाले. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा (Nashik Kalaram Mandir) दौरा निश्चित केल्याने अयोध्येत जाण्याचे टाळले. यावर आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत.
भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल, असं म्हणत आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातीरावर थयथयाट आहे! जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.