मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) 'काहे दिया परदेस' (Kahe diya Pardes) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकांपैकी एक होती. यातील मराठी मुलगी गौरी आणि उत्तर भारतीय मुलगा शिव यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय यातील इतर पात्रांचा अभिनयही अगदी उत्तम जुळून आल्याने प्रेक्षकांना ही मालिका अत्यंत जवळची वाटत होती. पण इतर मालिका जशा चार ते पाच वर्ष ताणल्या जातात तशी ही मालिका ताणली गेली नाही. मार्च २०१६ ते सप्टेंबर २०१७ असं साधारण दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हे देखील मालिकेच्या लोकप्रियतेचं एक कारण असू शकतं.
मालिका संपल्यानंतर आता तब्बल ७ वर्षांनी मालिकेतील शिव-गौरी (Shiv Gauri) म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि अभिनेता रिषी सक्सेना (Rishi Saxena) यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे. मात्र, ते मालिकेच्या दुसर्या भागासाठी एकत्र आले नसून त्यांचा एक नवा सिनेमा येणार आहे, ज्याचं नुकतंच शूटिंग पूर्ण झालं आहे. रिषी आणि सायली मालिकेनंतर अनेक वेगवेगळ्या सिनेमा-मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते, मात्र त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे.
रिषीने सोशल मीडियावर त्यांच्या आगामी सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. 'समसारा चॅप्टर १' (Samsara chapter 1) असं या सिनेमाचं नाव असून काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली होती. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो रिषीने शेअर केले. त्यामधील रिषी-सायलीचा एकत्र फोटो पाहून चाहते खूश झाले. त्यांनी कमेंट्समधून आनंद व्यक्त करत या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'जन्म-मृत्यूच्या द्वंदाची एक अनोखी गोष्ट' असं या सिनेमाबबातची घोषणा करताना सांगण्यात आलं होतं. सायली-रिषी यांच्यासह सिनेमात साक्षी गांधी, तनिष्का विशे, प्रियदर्शिनी इंदलकर, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी अशी स्टारकास्ट असणार आहे. सागर लाढे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.