उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा
नागपूर : जर गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यांतील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. राज्यातील कांद्याची निर्यातबंदी झाल्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाला. त्यानंतर विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावर चांगलच घेरले. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी कांदा लिलाव संदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली.
कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच ३१ मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचा निषेध संपूर्ण राज्यभर करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. परंतु सहकार विभागाने जर सलग तीन दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये कांद्यांचे लिलाव सुरु झाले.
देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, मी पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा आपल्या देशात कांदा जास्त प्रमाणात असतो तेव्हा आपण निर्यातबंदीची परवानगी देतो. पण आता देशामध्येच कांदा २५ ते ३० टक्के कमी आहे. देशातच कांदा उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. सध्या यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. पण गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यांतील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.