संजय राऊतचे कुटुंबीय सापडणार आणखी अडचणीत
काय आहे खिचडी घोटाळा? आणि कुठून कसा फिरला पैसा?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कोविड काळादरम्यान (Covid Pandemic) कामगारांच्या खिचडीचे पैसे चोरल्याचा आरोप आहे. पण हे प्रकरण केवळ संजय राऊतांवर न थांबता आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे संजय राऊत आणखी अडचणीत सापडणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार संजय राऊतांचा ‘खिचडीचोर’ असा उल्लेख करत असतात. यासंबंधी आता वेगाने तपास सुरु असून हे प्रकरण अख्ख्या राऊत कुटुंबियांनाच भोवण्याची शक्यता आहे.
कोविड काळात खिचडीचं कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीचे राजीव साळुंखे (Rajiv Salunkhe) हे या खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्या खात्यातून लाखोंचा निधी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांच्या खात्यात जमा झाला. याचे पुरावेही पोलीस तपासात समोर आले आहेत. त्यानंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत (Sandip Raut) आणि कन्या विधीता राऊत (Vidhita Raut) यांच्या खात्यात जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबियांच्याही अडचणी वाढणार आहेत.
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरीब स्थलांतरित कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंबधी चौकशी सुरू आहे.
खिचडी घोटाळ्यातील पैसा कुठून आणि कसा फिरवला गेला?
पोलीस तपासात खिचडी घोटाळ्यातील अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवल्याचा आरोप पोलिसांनी सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीवर केला आहे. मुळात या कंपनीचा पत्ता चुकीचा देण्यात आला असून या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.
इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति ३०० ग्रॅम खिचडीचे ३३ रुपये मंजूर केले असताना, केवळ १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करत ५ कोटी ९३ लाख ९७ हजार २३५ रुपये स्विकारण्यात आले. प्रत्यक्षात मात्र खिचडी बनवण्यासाठी ३.२० कोटी देत, उर्वरित २ कोटी ३ लाखाच्या निधीचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खिचडी वाटपाची वर्क ऑर्डर मिळवून देण्यास मदत करणे आणि खिचडी कन्सलटन्सी सर्विसेस पुरवणे या गैरकामांतून सुजीत पाटकर यांना पैसे मिळाल्याचा आरोप आहे.
सुजीत पाटकर यांच्या खात्यातून गैरलाभातून मिळालेले ४५ लाख रुपये तसेच सुजीत पाटकर यांच्या सांगण्यानुसार विधिता राऊत यांच्या खात्यात १४.७५ लाख, तर संदीप राऊत याच्या खात्यात ७.७५ लाख रुपये वळते केल्याचेही पुरावे पोलिसांना सापडले आहेत. या आर्थिक घोटाळ्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.