पुणे: राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आता राज्य निवडणूक आयोगानेही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावले आहे.
राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ज्याची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू देखील झाली आहे. पण, आता निवडणूक आयोगानेही यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली असल्यामुळे राज्यात लवकरच निवडणुकांचे पडघम सुरू होण्याची ही चाहूल आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्या अनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ हाच या बैठकीचा विषय असून १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.