मराठा आरक्षण मिळवूनच शांत बसणार…
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj Reservation) मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कंबर कसून कामाला लागलं आहे. आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे त्या मुदतीच्या आत आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभरात दौरा करण्याचे योजले आहे. आजपासून या दौर्याला सुरुवात होणार असून जरांगे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगेंची आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे संध्याकाळी ६ वाजता सभा पार पडणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल १२५ एकर शेतामध्ये या सभेची तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
७५ वर्षांत आरक्षणासाठी कोणी काय काय केले, हे समाजासमोर मांडणार
मनोज जरांगे म्हणाले आहेत की, मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला आहे. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे ४० टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. मराठा आरक्षणासाठी मागील ७५ वर्षांत कोणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार. ज्या नोंदी सापडल्या त्यावरून मराठा कुणबी एकच आहे, असा अहवाल तयार केला जात आहे. त्याबाबत कायदा मंजूर करून राज्यभरात सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.