नवी दिल्ली: भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात जपानला ४-० असे हरवत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब जिंकला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा हा खिताब जिंकला.
भारतासाठी संगीता(१७वे मिनिट), नेहा(४६वे मिनिट), लालरेमसियामी(५७वे मिनिट) आणि वंदना कटारिया(६०वे मिनिट) यांनी गोल केले. संगीता आणि वंदना यांनी मैदानी गोल केले तर नेहा आणि लालरेमसियामी यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोलची संधी साधली.
रविवारी रांचीच्या मारंग गोमके जयपाल सिंह एस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना खेळवण्यात आला. विजयानंतर हॉकी इंडियाने घोषणा केली की प्रत्येक खेळाडूला तीन-तीन लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल. यासोबतच सहयोगी स्टाफमधील प्रत्येक सदस्याला १.५ लाख रूपये दिले जातील.
कोबायाकावा शिहोने २२व्या मिनिटाला गोल केला होता मात्र व्हिडिओ रेफरलनंतर तिचा हा प्रयत्न बाद ठरवण्यात आला. जपानला ५२व्या मिनिटाला पेनल्ट्री स्ट्रोक मिळाला होता मात्र काना उऱाताच्या शॉटवर भारताची गोलकीपर सविता पुनियाने तो रोखण्यात यश मिळवले.
भारतीय संघाने याआधी स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये आणि २०२३ आशियाई स्पर्धेतील कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानला २-१ असे हरवले होते. तर होंगझाऊ आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या चीनने दक्षिण कोरियाला २-१ असे हरवत तिसरे स्थान मिळवले होते.