Cabinet decision : राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार

मुंबई : राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती (Drought In Maharashtra) असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.


राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.


आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.


राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट आली असून रब्बी पेरण्या देखील संथपणे सुरु आहेत. आतापर्यंत १२ टक्के पेरण्या झालेल्या आहेत अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.



राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय


नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत


नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


जून ते ऑक्टोबर 2023 या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेऐवजी आता 3 हेक्टर मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यात येईल.


त्याचप्रमाणे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादेत मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 2 हेक्टर मर्यादेत मिळेल.



चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार; कायद्यात सुधारणा करणार


चिटफंड न्यायालयीन प्रकरणांना वेग देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. चिटफंड कायदा, 1982 मधील कलम 70 नुसार चिटस् सहनिबंधक, राज्यकर विभाग यांनी दिलेल्या लवाद निर्णयाविरुध्द दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. सध्या प्रलंबित असलेल्या चिटफंड अपीलांची संख्या पाहता, न्यायदानास होणारा विलंब टाळण्याकरिता व अपीलकर्त्यांची सोय व्हावी, याकरिता राज्य शासनास असलेले अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान करण्यात येतील.


या विधेयकामध्ये चिटफंड कायदा, 1982 यामधील एकूण 2 कलमे (कलम 70 व कलम 71 ) यामध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात येईल. त्यामुळे या सुधारणेमुळे कलम 70 अन्वये अपील सुनावणीचे याबदलामुळे प्रलंबित चिटफंड अपिलांचा निपटारा अधिक गतिमान पद्धतीने होऊन अपिलकर्त्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.



चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुला मुलींसाठी आयटीआय


मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे.


अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विभागात शासकीय उच्च स्तर आयटीआय कमी प्रमाणात आहेत. या मुलांना रोजगारक्षम करून उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी हे आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 10 ट्रेड्सच्या (व्यवसाय अभ्यासक्रम) प्रत्येकी 2 तुकड्या याप्रमाणे 20 तुकड्या सुरु करण्यात येतील. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर अशी 36 पदे आणि बाह्य यंत्रणेद्धारे 8 पदे अशा 44 पदांना आणि त्यासाठी येणाऱ्या 5 कोटी 38 लाख 88 हजार इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.



नांदगावपेठ येथील पीएम मित्रा पार्कसाठी मुद्रांक नोंदणी शुल्कात संपूर्ण सूट

अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 17 मार्च रोजी या ठिकाणी ब्राऊन फिल्‍ड पीएम मित्रा पार्क स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्ककरिता केंद्राकडून 200 कोटी रुपये सहाय्य मिळणार असून या ठिकाणी 410 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 10 कोटी भागभांडवल असलेली एसपीव्ही स्थापन करण्यात येत असून ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी 100 टक्के मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येईल.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत