ठाकरे गट-समाजवादी पक्षांच्या युतीवर एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र
मुंबई : आज वांद्रे येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धर्मनिरपेक्ष समाजवादी पक्षाशी (Samajwadi party) युती करुन आपण बाळासाहेबांच्या विचारांशी किती एकनिष्ठ राहिलो आहोत, हे दाखवूनच दिले. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळ आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतले. तेव्हाच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व कळाले. बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे. या राज्यातील मतदारांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंकडून बाकी अपेक्षा नाही. ते आता सगळ्यांशी युती करतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
त्याचसोबत ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्या लोकांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही. या सगळ्यांना हे जवळ करतील हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने केलेले काम आणि वर्षभरात राज्यात आम्ही करत असलेल्या विकासकामांना नक्की पोचपावती देतील. जनता मतदार सुज्ञ आहे. घरात बसलेल्या लोकांना जनता मतदान करणार नाही. रस्त्यावर उतरून विकासकामे करणाऱ्यालाच जनता मतदान करणार असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.