चेन्नई: आयसीसी वनडे विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ६ विकेट राखून हरवले. चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक ठरला होता. एक वेळ अशी आली होती की जेव्हा भारतीय चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता.
सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०० धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. याच्या प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने सुरूवातीला २ धावांवर आपले ३ विकेट गमावले होते.
ऑस्ट्रेलियाची एक चूक आणि....
यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने मोर्चा सांभाळला. मात्र पुन्हा एकदा अशी वेळ आली की ऑस्ट्रेलियाकडे सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची चूक झाली आणि त्यांच्या हातून संधी गेली आणि सामनाही गेला.
डावातील ८व्या ओव्हरमध्ये जोश हेझलवूडने गोलंदाजी केली होती. याआधी त्याने २ विकेट घेतल्या होत्या. त्यावेळेस भारताची धावसंख्या ३ बाद २० इतकी होती. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कोहलीने हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल हवेतच सर्कलच्या आत राहिला.
कोहलीला मिळाले जीवनदान
कोहलीचा कॅच पकडण्यासाठी विकेटकीपर अॅलेक्स कॅली आणि मिचेल मार्श धावले. मात्र दोघांमध्ये गोंधळ झाला आणि यातच बॉल खाली आल्यानंतर मार्शच्या हातातून निसटला. ही चूक ऑस्ट्रेलियाच्या संघाला खूपच भारी पडली. मिचेल मार्श आपली ही चूक कधीच विसरणार नाही.
कोहलीचा कॅच सुटला तेव्हा तो १२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने सामन्यात ११६ बॉल खेळत ८५ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजय साकारता आला. याशिवाय केएल राहुलने ११५ बॉलमध्ये ९७ धावांची खेळी केली. यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय साकारता आला.