
सूर्याजी पिसाळ असणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊ नयेत
भाजप आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आज सकाळी नैतिकता, लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली शपथ ही फार मोठमोठी वाक्ये वापरताना दिसला. संजय राऊत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अशा बरबटलेल्या लोकांकडून नैतिकता हा शब्द ऐकणं म्हणजे उद्या दाऊदने महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेवर धडे देण्यासारखं आहे. स्वतः नैतिकतेचे धिंडवडे उडवले, खासदार म्हणून आमदार म्हणून मुख्यमंत्री किंवा शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून घेतलेली कोणती शपथ पाळली? बाळासाहेबांच्या शिवसेनेला बरबाद करण्यामध्ये सर्वात मोठा हात कोणाचा असेल तर तो संजय राऊतचा आहे. सूर्याजी पिसाळ असणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
नितेश राणे म्हणाले, अंबादास दानवे जे आज नागपूर दौऱ्यावर आहेत, ज्यांना खूप नागपूर आठवत आहे त्यांनी आम्ही तयार केलेले रस्ते, पायाभूत सुविधा, मेट्रोचे जाळे बघावे आणि मातोश्रीवर जाऊन विरोधी पक्षनेता म्हणून जाब विचारावा की तुम्ही मुंबईसाठी नेमकं काय केलं? येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.
अनिल परब यांनी मातोश्रीवर दबाव एवढा वाढवला आहे की, कुठल्याही परिस्थितीत मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता बनवा कारण माझ्या केलेल्या कारनाम्यांमुळे, भ्रष्टाचारामुळे मला अटक होणार आहे, असं सतत अनिल परब मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन रडत आहेत. त्यामुळे दानवे नागपूर फिरले काय किंवा मुंबई फिरले काय किंवा छत्रपती संभाजीनगर फिरले काय त्यांचं विरोधी पक्षनेते पद राहणार नाही. त्यामुळे वायफळ बडबड बंद करा आणि कार्टुन बघायचंच असेल तर आपल्या मालकाच्या मुलाकडे बघा कार्टुन कसं असतं ते तुम्हाला कळेल, असं म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
संजय राऊत खासदार राहणार नाहीत
काल दिलेल्या माझ्या पत्रानंतर अध्यक्षांवर होणारं आक्रमण थोडंसं कमी झालेलं दिसतंय, असं नितेश राणेंनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही कितीही स्वतःला खासदार असल्याचं सांगितलात तरी तुमचा थयथयाट थांबवा कारण संजय राऊत काही जास्त महिने खासदार राहणार नाही.
इंडिया अलायन्स ओसाड गाव आणि संजय राऊत ओसाड गावचे पाटील
संजय राऊत असंही म्हणाले की एनडीएमध्ये जोपर्यंत शिवसेना, अकाली दल हे पक्ष होते तेव्हाच एनडीए मजबूत होती. पण कदाचित सकाळीच थोडी नाईन्टी मारलेली असल्यामुळे ते हे विसरले असतील की निवडणूक आयोगाप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांकडे खरी शिवसेना आहे आणि ती शिवसेना आज मोदीजींसोबत एनडीएमध्ये उभी आहे. पण एनडीएची चिंता करण्यापेक्षा तुमच्या इंडियाला नेमकं काय झालं त्याची माहिती द्या. त्याचं साधं चिन्ह तरी तयार करु शकलात का? बैठकांवर बैठका घेताय आणि एआयएडीएमके (AIADMK) वर चर्चा करण्यापेक्षा काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे हरियाणाचा काल इंडिया अलायन्सचा कार्यक्रम सोडून बिहारमध्ये पंडितजींची जयंती साजरी करत होते, याबद्दल भाष्य करा. इंडिया अलायन्स हे ओसाड गाव बनत चाललं आहे आणि ओसाड गावचे पाटील म्हणून तुम्ही एनडीए अलायन्सवर बोलण्याची हिंमत करु नका, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
संजय राऊतवर कारवाई होणार
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या सुनावणीला उशीर होत असल्याने संजय राऊत 'घटनेचा खून' असे शब्दप्रयोग करत आहेत. यावर नितेश राणे यांनी त्यांना खडे बोल सुनावले. अध्यक्षांवर अशा पद्धतीने दबाव टाकणं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. अध्यक्ष हे सध्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, म्हणून न्यायाधीशांवर असे शब्दप्रयोग करणं नियमबाह्य आहे. त्यामुळे हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाणार आणि राऊतांवर कारवाई होणार, असं नितेश राणे म्हणाले.