धुळ्यात सापडले होते बेवारस अवस्थेत
पुणे : आपल्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेडं करणार्या गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच ते धुळे (Dhule) शहरात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यांच्यावर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. गौतमीला याबाबत कळताच तिने वडिलांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात उपचारांकरता आणले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. पुण्यातील (Pune) चिंतामणी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गौतमी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती. आता त्यांचे निधन झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
नेमकं काय झालं होतं?
गौतमीच्या वडिलांचं नाव रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असं आहे. तीन-चार दिवसांपूर्वी ते धुळे शहरात आजळकर नगर भागात मरणासन्न अवस्थेत सापडले होते. स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांनी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे सापडलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचं समोर आलं.
गौतमीच्या नातेवाईकांना संपर्क केला असता तिची मावशी व चुलत बहीण हिरे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र त्यांनी गौतमीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. गौतमीला ही बातमी कळताच तिने मावशीला वडिलांच्या तब्येतीची विचारणा करण्यास सांगितले व पुढील उपचारांसाठी पुण्याला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मावशी धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेली. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
कसं आहे गौतमीचं आणि वडिलांचं नातं?
गौतमीच्या लहानपणीच झालेल्या काही कौटुंबिक वादांमुळे तिची आई व वडील एकत्र राहत नव्हते. तिच्या वडिलांना व्यसने होती व त्यामुळे वाद व्हायचे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गौतमीचे वडील रवींद्र पाटील म्हणाले होते की, गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहायला यावं. प्रसारमाध्यमांवर वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी प्रसिद्ध होताच गौतमीने वडिलांची दखल घेतली होती. त्यावेळेस ती म्हणाली होती की, वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra