नितेश राणे यांचं एटीएसला पत्र
मुंबई : अयोध्येला तयार होणाऱ्या राम मंदिराविषयी (Ayodhya Ram mandir) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार विरोधी विधाने करत आहेत. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? असा खडा सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरेंचा दंगली भडकवण्याचा इतिहास, पुण्यामध्ये दंगली भडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांची झालेली चौकशी आणि आताही सातत्याने दंगलींविषयी भाष्य करणं असे अनेक मुद्दे उपस्थित करत उबाठा गटाला त्यांनी चपराक लगावली होती. यानंतर आता पूर्वसूचनेनुसार नितेश राणे यांनी एटीएसला संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्याविषयी पत्र पाठवले आहे.
अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी दंगली होणार अशा उबाठा गटाच्या सातत्याच्या वक्तव्यांमुळे नितेश राणे म्हणाले होते की, 'दंगली भडकवण्याची माहिती कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्याने ती संबंधित पोलीस यंत्रणेला द्यावी, अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते. म्हणून उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडे राम मंदिराकडे जाताना दंगल होणार आहे, यासंबंधी कुठलीही माहिती असेल तर त्यांनी ती त्वरित सरकारी यंत्रणेला द्यायला हवी'.
पुढे ते म्हणाले, मीही स्वतः एटीएसला (ATS) पत्र लिहिणार आहे की, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची सखोल चौकशी करा आणि गरज असेल तर नार्को टेस्ट करा अशी मागणी करणार आहे. त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करुन अशा पद्धतीचा कोणताही दंगल घडवण्याचा प्रकार होणार असेल, तर तो थांबवण्याची विनंती या पत्राद्वारे मी सरकारला करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले. त्यानुसार आता नितेश राणे यांनी एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र पाठवले आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे ?
ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत आहे आणि २०२४ च्या सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येकडे जाणार आहेत, त्यावर उद्धव ठाकरे व संजय राऊत हे दोघेही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, रामभक्तांवर हल्ले होऊ शकतात, अशा प्रकारची विधाने करत आहेत. जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जातात, तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची विधानं ना संजय राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत. पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला मिळत असेल तेव्हाच या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.