
आता प्रेयसी थेट श्रीलंकेतून भारतात... कोण ही प्रेयसी? कसं जुळलं सूत?
प्रेमकहाणीत पोलीस मात्र बनले व्हिलन
चित्तूर : समाजमाध्यमांवरुन (Social Media) मने जुळण्याचे प्रकार हल्ली चांगलेच वाढताना दिसत आहेत. एकीकडे महिला सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असतानाच काही डेअरिंगबाज महिला मात्र आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी घरादाराची पर्वा न करता थेट दुसर्या देशाची वाट (Cross- border love) धरत आहेत. सीमाने सीमा पार केल्यानंतर अंजूनेही सीमा पार केली. आता सीमा हैदर जणू काही प्रेरणेचे स्रोत असल्याप्रमाणे काही प्रेयसी तिच्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या प्रियकराच्या देशात घुसत आहेत (Love beyond boundaries). अशीच एक ताजी घटना आता पुन्हा समोर आली आहे. यात शिवकुमारी विघ्नेश्वरी (Shivkumari Vighneshwari) नावाची तरुणी प्रियकराशी लग्न करण्यासाठी श्रीलंकेतून भारतात (Shrilanka to India) आली आहे.
शिवकुमारी विघ्नेश्वरी ही २५ वर्षीय तरुणी असून तिची फेसबुकवर (Facebook) लक्ष्मण (Laxman) या आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी मुलाशी ओळख झाली. कालांतराने गप्पा, सततचं बोलणं यातून त्यांचं सूत जुळलं आणि प्रकरण थेट लग्नापर्यंत जाऊन पोहोचलं. लग्नासाठी ही तरुणी टुरिस्ट व्हिसावर श्रीलंकेतून भारतात आली.
कसं झालं लग्न?
व्ही कोटा मंडळाच्या अरिमकुलापल्ले येथील लक्ष्मणची २०१७ मध्ये फेसबुकवर श्रीलंकेतील विघ्नेश्वरीची ओळख झाली होती. सहा वर्षांच्या या प्रेमकहाणीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर विघ्नेश्वरी ८ जुलैला कोलंबोहून टुरिस्ट व्हिसावर चेन्नईला पोहोचली. लक्ष्मण तिला घेण्यासाठी चेन्नईला गेला. लक्ष्मणच्या कुटुंबीयांच्या संमतीने २० जुलै रोजी चित्तूर जिल्ह्यातील व्ही कोटा येथील एका मंदिरात या जोडप्याचे लग्न झाले.
प्रेमकहाणीत पोलीस मात्र बनले व्हिलन
शनिवारी सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाची बातमी व्हायरल होताच चित्तूर जिल्हा पोलिसांनी तिला १५ ऑगस्टला व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी देश सोडण्याचे किंवा एक्सटेन्शनचे निर्देश दिले. पोलिसांनी त्यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याने या जोडप्याचा आनंद अल्पकाळ टिकला. पोलीस अधीक्षक (एसपी) वाय रिशांत रेड्डी यांनी विघ्नेश्वरीला नोटीस बजावली कारण तिचा व्हिसा १५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. तिला श्रीलंकेला परतावे लागेल, अशी सूचना पोलिसांनी केली आहे.
प्रेमासाठी नायिकेचा लढा
विघ्नेश्वरीने मात्र तिच्या देशात परतण्यास नकार दिला आणि भारत सरकारला विनंती केली की तिला कायमस्वरूपी देशात राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून ती तिच्या पतीसोबत राहू शकेल. विघ्नेश्वरी भारतीय नागरिकत्व मिळविण्याची योजना आखत आहे आणि तिला प्रक्रिया आणि निकष देखील समजावून सांगण्यात आले आहेत. तिने शनिवारी भारतात परतण्यासाठी तिच्या व्हिसाच्या एक वर्षाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे.