Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीfertilizers black market: खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषीमंत्र्यांनी उचलली महत्वाची पाऊले!

fertilizers black market: खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषीमंत्र्यांनी उचलली महत्वाची पाऊले!

मुंबई (प्रतिनिधी) : बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर विभागामार्फत कारवाई सुरू आहे. खतांच्या लिंकिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना विभागामार्फत नोटीस पाठवलेल्या आहेत. राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई, खते आणि बियाणांचा दुकानातील उपलब्ध साठा याची माहिती शेतकऱ्यांना डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळेल. खतांबरोबरच बियाणे, कीटकनाशके यांच्या उत्पादन व विक्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. यावर आळा बसावा, यासाठी राज्य शासन नव्याने अधिक कडक कायदा आणणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.

राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण खताची योग्य दरात विक्री होण्याकरिता गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत दक्षता घेण्यात येते. राज्यात गुणवत्तापूर्ण खत मिळण्यासाठी १ हजार १३१ खत निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्य तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात येते. राज्य, विभाग व जिल्हास्तरावर ३९५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ६८८ उत्पादक असून ४०५ खत उत्पादकांची तपासणी करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ४६ हजार ५२७ विक्रेते असून ३१ हजार १७७ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्याआधारे ४२६ अप्रमाणित नमुन्यांपैकी ३६१ नमुने न्यायालयीन कारवाईस पात्र आहेत, त्यावर प्रचलित नियमान्वये कायदेशीर कारवाई सुरु आहे. तसेच १० न्यायालयीन दावे दाखल करण्यात आलेले आहेत. माहे जुलै २०२३ अखेर खताचा २५२ मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला असून, त्याचे मूल्य ७३ लाख इतके आहे. राज्यात २४६ खत परवाने निलंबित करण्यात आले आहेत व ५३ परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. ५३९ ठिकाणी विक्रीबंद आदेश दिलेले आहेत. राज्यामध्ये १६ पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खताबाबत तसेच लिंकिंगविषयीच्या तक्रारींच्या निवारणाकरिता कृषी आयुक्तालयामध्ये २४ तास तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून व्हाट्सअप नंबरची निर्मिती करुन त्यावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, किशोर पाटील, आशिष शेलार, रोहित पवार यांनी सहभाग घेतला.

दै. प्रहारने वेधले होते लक्ष

ऐन पेरणीचा हंगाम सुरु असतांना बाजारातून बियाणे आणि खतं बेपत्ता होऊ लागली होती. विशेषतः केंद्र शासनाच्या भारतीय जनउर्वरक परियोजनेत अनुदान प्राप्त युरिया शेतकऱ्यांना दाम दुप्पट दराने विकला जात होता. शासन पातळीवरून मुबलक प्रमाणात पुरवठा होत असतांना अनुदानित युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध का होत नाही? काळा बाजारात तर विकला जात नाही ना? अशी शंका दै. प्रहारने सलग दोन दिवस प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतून उपस्थित केली होती. या वृत्ताची शाई सुकते ना सुकते तोच नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निफाड तालुक्यातील या शासकीय युरियाचा सुरु असलेला काळा बाजार चव्हाट्यावर आणल्याने प्रहारच्या वृत्ताला दुजोराच मिळाला. दरम्यान या रॅकेट मध्ये काही राजकीय पक्षांशी संबंधित चेहरे सहभागी असल्याची चर्चा असल्याने कृषी मंत्री हे प्रकरण किती गंभीरतेने हाताळतात यावरच शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार कि भविष्यातही अशीच सुरु राहणार हे अवलंबून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -