'चोर मचाये शोर' म्हणत करणार शक्तिप्रदर्शने
मुंबई : मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाने १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. परंतु पालिकेला १ जुलै या दिवशी सुट्टी असते त्यामुळे ठाकरे गट निवेदन देणार कोणाला, असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता यासोबतच ठाकरे गटाच्या चिंतेत आणखी भर पडत चालली आहे. ठाकरे गटाच्या मोर्चाच्याच दिवशी महायुती देखील मोर्चा काढत प्रत्युत्तर देणार आहे. यावेळेस 'चोर मचाये शोर' असे नारे देण्यात येणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी निघणा-या विराट मोर्चाला महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर मिळणार आहे. भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) आणि आरपीआय (RPI) महायुतीकडून काढण्यात येणा-या या मोर्चात 'चोर मचाये शोर'चे नारे देत शक्तिप्रदर्शने करण्यात येणार आहेत. मोर्चाची सुरुवात भाजपच्या नरिमन पॉईंट (Nariman Point) येथील प्रदेश कार्यालयातून होईल. मागील २५ वर्षांत सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, असं भाजप युवा मोर्चातर्फे सांगण्यात आलं.
ठाकरे गटाच्या मोर्चाच्या मार्गाबद्दलची मागणी अजून प्रतिक्षेत
ठाकरे गटाने मेट्रो सिनेमा ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत या मार्गावरुन मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशा आशयाचं पत्र पोलिसांना दिलं होतं. मात्र, कायदा आणि सुव्यस्थेच्या प्रश्नावरुन या मार्गावरुन मोर्चाला परवानगी देण्यास अडथळे होत असल्याची बाब सांगत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मोर्चाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा पोलिसांना पत्र दिलं आहे. त्यावर पोलीस निर्णय घेणार आहेत.