भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण झाले. भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड ते बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि गोवा (मडगाव) ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु झाल्या आहेत.
गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान धावेल तसेच गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील पर्यटनाला देखील चालना देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवशी पाच वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा कंदील दाखला आहे. यापैकी दोन ट्रेन मध्य प्रदेश, एक कर्नाटक, एक बिहार आणि महाराष्ट्रातून धावणार आहेत. बंगळुरु-हुबळी-धारवाड, मुंबई-गोवा, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर अशा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. या रेल्वेच्या लोकार्पणांचा कार्यक्रम यापूर्वीच पार पडणार होता. परंतु ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर या गाड्यांचं लोकार्पण पुढे ढकलण्यात आलं होतं.
वंदे भारत एक्स्प्रेस ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून धावेल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन धावेल.
ही ट्रेन सीएसएमटी स्टेशन, मुंबईवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल आणि मडगाव स्टेशन, गोव्याला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. हा प्रवास दहा तासांचा असेल.
तर परत येताना ही ट्रेन मडगावहून दुपारी 12.20 वाजता निघेल आणि मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. हा प्रवास देखील दहा तासांचा असेल. तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाईल आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra