चंद्रपुर : अलमारीत सांगाडे असणाऱ्यांनी सावकारीचा आव आणू नये. सांगाडे बाहेर काढू, अशी थेट जाहीर धमकीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) दिली आहे.
परिवार वादावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरेंना त्यांनी ट्विटमधूनच उत्तर दिलं होते. या ट्विटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम तुटले आहेत असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंनी काय ते समजून घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका परिवार तुम्हाला देखील आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर आले आहेत, बाहेर येत आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
या परिवार वादावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली असून फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरेंना 'मातोश्री'च्या अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याची जाहीर धमकीच दिली आहे. तसेच फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडला तर सोडत नाही, असंही त्यांनी ठामपणे बजावले आहे. चंद्रपुरातील सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले.
'तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू?
काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, 'तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू?' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता. त्यामुळे माझ्या नादी लागू नका.
परिवारवादी एकत्र आले ही मोदींची उपलब्धी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना चिंता कुटुंबाची. आणि ज्यांचा परिवार संपूर्ण देश आहे, ते आहेत नरेंद्र मोदी. बरे या बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा, अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केली.