आमदार नितेश राणे यांचा संजय राऊत यांना थेट सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून ‘काका मला वाचवा’अशी विनंती केली होती. आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांना भेटतात हे राऊत यांना सांगितले आहे काय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलण्यापेक्षा आदीत्यने भेट का घेतली आणि अजून भेटी कुठे होणार आहेत? याची संजय राऊत यांनी माहिती द्यावी असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राउत यांचा समाचार घेतला.
पुढे नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कारकीर्द यशस्वीरीत्या ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संजय राऊत यांचा जळफळाट झाला. कदाचित संजय राऊत विसरले असतील की या ९ वर्षांपैकी ५ वर्षे एनडीएमध्ये होते. उद्धव ठाकरे यांना मिळालेले आमदारकी मोदींमुळेच मिळालेली आहे. त्या आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सांगत होते तो आधी द्यावा. उद्धव ठाकरे यांच्या वृत्तीमुळे स्व.बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार त्यांनी गाडून टाकले. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री होते तेव्हा काय केले ते सांगावे. ठाकरे भावा-भावात संजय राऊत यांनीच आग लावली. आता महाविकास आघाडीत सुद्धा तेच करत आहेत. शिवसेनेचे आमदार आणि खासदार जाणार, त्यांची खासदारकी रद्द होणार असे भाकीत करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रकरणी कारवाई होऊन त्यांची खासदारकी जाणार आहे. त्याची चिंता करावी, असे नितेश राणे म्हणाले.