Thursday, June 19, 2025

पर्यटनासाठी कोकणास पसंती...

पर्यटनासाठी कोकणास पसंती...

ठंडा ठंडा कुल कुल होण्यासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने...


ठाणे (प्रतिनिधी) : वैशाख वणवा पेटला असताना उन्हाच्या चटक्यांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा वाढत असताना पर्यटक मात्र सुट्टीचा आनंद घेण्यासाठी यंदा कोकणाला सर्वाधिक पसंती देत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी त्याचप्रमाणे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओढा वाढला आहे.


उन्हाळा असूनही कोकणात जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी काहीशी वाढली असून, भाविकांच्या गर्दीने मंदिरे फुलली आहेत. एकीकडे पर्यटन तर दुसरीकडे देवदर्शनाचा आनंद घेताना अनेक कुटुंबे दिसत आहेत. सध्या उकाडा वाढत असला, तरी काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारवा वाढलेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तिन्ही ऋतू एकदम सुरु असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये कोकणापेक्षा कुलू-मनाली, काश्मिर, हिमाचल प्रदेश यासह महाराष्ट्राबाहेर पर्यटक फिरायला जातात. मात्र, बहुतांश पर्यटक मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला जाण्यासाठि पसंती दर्शवितात. तर, बदलत्या ऋतुमानामुळे यंदा उन्हाळ्यातही पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे फिरण्याचा आनंद घेत आहेत.


सध्या गणपतीपुळे, तारकर्ली, मालवण, अलिबाग, काशीद, मुरुड, मुंबईतील जुहू यासह श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, दापोलीसह अन्य समुद्रकिनारी पर्यटक हजेरी लावत आहेत.



दक्षता आवश्यक...


कोकणातील रस्ते छोटे आणि वळणा वळणाचे आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहने चालवताना थोडी काळजी घ्यावी. तरुण मंडळी हुल्लडबाजी करीत प्रवास करतात. मात्र, आपला धिंगाणा जीवावर बेतणार नाही, याची काळजी घ्यावी. कोकणात घाट रस्त्यांमुळे रात्री प्रवास टाळावा. बहुतांश ठिकाणी मोबाइल रेंज नसते. त्यामुळे वाहन सुस्थितीत आहे ना? याची खबरदारी घेऊनच प्रवास करावा. आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे अन्नपदार्थ खाताना ताजे आणि स्वच्छ असल्याची खात्री करावी. उन्हातून प्रवास केल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये, लहान मुलांना उन्हाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. समुद्रकिनारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या काळात जाण्याचा सल्ला पर्यटकांना देण्यात आला आहे.

Comments
Add Comment