वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील अनेक खेडोपाड्यांतून जनावरांची संख्या कमी होत असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडत असल्याचे दिसून येत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. तालुक्यात विविध जातींच्या भाताच्या वाणाची लागवड शेतकरी करीत असतात. यासाठी प्रत्येक शेतकरी बैलजोडी, गाई, म्हशी सांभाळत असे. याच जोडीला शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याही शेतकरी सांभाळत असत. मात्र यांत्रिकीकरणामुळे पॉवरटिलर, मोठे ट्रॅक्टर आल्याने शेतकऱ्यांनी हळूहळू पशुधन कमी करून पॉवरटिलर, मोठे ट्रॅक्टर घेतले. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही आहेत अशांनी जमिनीची चिखळणी, उखळणी अशी मशागत करण्यासाठी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन मशागत करणे सुरू केले. त्यातच वर्षभर बैलजोडी व इतर जनावरांचा सांभाळ करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने तसेच खर्च परवडत नसल्याने जनावरे कमी करून यांत्रिक शेतीला पसंती दिली.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी बैलजोडी असायचीच. याचबरोबर दुभदुभत्यासाठी गाई-म्हशी असायच्या, प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी कोंबड्या, बकऱ्या असायच्या, त्यामुळे पशुधनाच्या उपचारासाठी विभागवार पशुवैद्यकीय दवाखाने शासनाने स्थापन केले आहेत. मात्र खेड्यापाड्यांत आजची परिस्थिती बदलली असून, गावोगावी हातावर मोजण्यासारख्याच शेतकऱ्यांच्या घरी जनावरे आहेत, त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखानेही ओस पडत असल्याचे दिसून येत आहे.