Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखयोगी आदित्यनाथ बनले गुंडांचे कर्दनकाळ

योगी आदित्यनाथ बनले गुंडांचे कर्दनकाळ

देशात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वच क्षेत्रांत अनेक लक्षणीय बदल झालेले दिसून आले. मोदींनी देशातील आणि राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यावर मोठा भर दिला. मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश राज्याची धुरा योगी आदित्यनाथ यांच्या हाती सोपविली. योगींना जेव्हा या पदावर बसविण्यात आले, तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते आणि योगींना हे पद सांभाळणे कितपत जमेल याबाबत अनेकांनी शंका-कुशंका व्यक्त केल्या होत्या. उत्तर प्रदेशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक अशी सर्व स्तरावर बजबजपुरी माजली होती. राज्यात अनेक बाहुबली आपापल्या इलाक्यात स्वत:ची हुकूमत गाजवत होते. हे करताना त्यांना जो कोणी आडवा जाईल त्याला कायमची अद्दल घडविली जाई किंवा त्याला कायमचे संपविले जाई. एकूणच या राज्यात अनेक गुंड, दहशतवाद्यांचे वर्चस्व आणि समांतर असे सरकार कार्यरत होते. त्यांच्या दादागिरीला येथील जनता पुरती विटली होती. त्यामुळेच मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर योगींसारख्या तरुण तडफदार नेत्याला बसवून राज्यातील गुंडगिरी मुळापासून उपटून काढण्याची महत्त्वाची सूचना केली. त्यानंतर योगींनी आणि त्यांच्या पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून गुंडांचा सफाया करण्याचे काम सुरू केले. त्यांनी एकेक करून बाहुबलींचा खात्मा केला. त्यातच उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी जगतावर जवळपास चार दशके राज्य करणाऱ्या अतिक अहमद याचे साम्राज्य मोडीत काढण्याचा विडा योगी सरकारने उचलला आणि आता ते जवळपास नष्ट झाले आहे.

एकेकाळी अतिक अहमद आणि त्याचे कुटुंबीय यांचे राज्यात फार वर्चस्व होते. पण आज त्या कुटुंबीतील काही सदस्य तुरुंगात आहेत किंवा पोलिसांचा ससेमीरा पाठी लागल्याने ते फरार झाले आहेत. या माफिया अतिक अहमदला आता सर्वात मोठा धक्का बसला असून त्याचा तिसरा मुलगा असद अहमद आणि शार्पशूटर गुलाम यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी एका चकमकीत ठार मारले. असद हा झाशीच्या बाबिनाजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. विशेष म्हणजे असद हा उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, नेपाळ पोलिसांच्या रडारवर होता. आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळले, तेव्हा अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आतापर्यंत लोकांची हत्या करणाऱ्या अतिक अहमदसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. कारण, त्याच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची अशा प्रकारे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. अतिक अहमद याला पाच मुले आहेत. उमर आणि अली ही दोन मुले खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत, तर उमेश पाल हत्येप्रकरणी पाच लाखांचे बक्षीस असलेला एक मुलगा असद हा चकमकीत ठार झाला आहे, तर दोन अल्पवयीन मुले बालसंरक्षणगृहात आहेत. तसेच उमेश पाल खून प्रकरणात पत्नी शाइस्ता परवीनचेही नाव आहे. तिच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले असून तीदेखील फरार आहे. तसेच त्याचा भाऊ अश्रफसुद्धा बरेली तुरुंगात बंद आहे. त्याशिवाय बहीण आयशा नुरी आणि तिच्या दोन मुलींनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या बहिणीचा नवरा डॉ. अखलाक याला अटक करून तुरुंगात टाकले आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी भावाची पत्नी झैनब फातिमा हिलाही आरोपी करण्यात आले आहे. अशा प्रकारे अतिक अहमदचे संपूर्ण कुटुंबच आता गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उमेश पाल खून प्रकरणात पोलीस आणि एसटीएफने अतिकच्या मुलासह चारजणांना चकमकीत ठार केले आहे, तर सध्या अरमान, गुड्डू मुस्लीम आणि साबीर हे फरार आहेत. तसेच तिघांवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यूपी एसटीएफला राजस्थानमधील अजमेर शरीफजवळ गुड्डू मुस्लीमचे लोकेशन सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पुढे तपास सुरू असून त्याचाही बिमोड केला जाणार आहे. असद याला दिल्लीतील एका माजी खासदाराने मदत केली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. तसेच उमेश पालची हत्या केल्यावर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम हे नाशिक आणि पुण्यालाही येऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. येथे त्यांना अबू सालेमच्या गुंडांनी मदतही केली आहे. अबू सालेम आणि अतीक यांची जुनी मैत्री असल्याचे तपासात समोर आले असून, त्यादृष्टीने सखोल तपास सुरू झाला आहे. योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक आहे. उत्तर प्रदेशात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजप सत्तेवर आल्यापासून उत्तर प्रदेशमधील एन्काऊंटरमध्ये वाढ झाली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षांत १० हजारांहून जास्त एन्काऊंटर झाले आहे, तर गेल्या सहा महिन्यांमध्ये ४३० हून अधिक एन्काऊंटर झाले आहेत. अशा प्रकारे मोठ्या धडाडीने येथील पोलिसांनी मिशन ‘क्राइम कंट्रोल’ यशस्वीपणे राबविले आहे. आज राज्यातील जनतेला सुरक्षित वाटू लागले आहे. यापूर्वी पोलीस कारवाई करताना घाबरायचे. कारण आपल्यावरच कारवाई होईल, अशी भीती त्यांना वाटायची. पण आता हे चित्र बदलले असून पोलीस सक्रिय झाले आहेत. म्हणजेच उत्तर प्रदेशातील गुंडाराज आता कायमचे नेस्तनाबूत झाले असून योगी आदित्यनाथ हे गुंडांचे कर्दनकाळ बनले आहेत, असेच म्हणायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -